Shocking News : एक व्यक्ती पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत होता. पण ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपात पती तुरुंगात होता ती पत्नी मात्र जिंवत होती, आणि जालंधरमध्ये आपल्या प्रियकरासोबत रहात होती. पंजाब पोलिसांनी या महिलेला अटक केली आणि या संपूर्ण प्रकरणाची उकल झाली. बिहारमधल्या मोतीहारी इथं ही विचित्र घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कोणत्याही चित्रपटाची कथा नसून प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. ही घटना केशरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीपूर गावातील असून, इथं राहणाऱ्या शांती देवी नावाच्या महिलेचा विवाह 14 जून 2014 रोजी केशरिया इथल्या दिनेश राम याच्याशी झाला होता.


लग्नाच्या सहा वर्षांनंतर 19 एप्रिलला म्हणजे मागच्या महिन्यात हि महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. प्रियकरासोबत ती जालंधरमध्ये स्थायिक झाली. इथे महिला गायब झाल्याने तिच्या वडिलांनी पोलिसात मुलीच्या पतीविरोधात तक्रार केली. मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह गायब केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. 


पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता महिलेच्या पतीला हत्येच्या आरोपाखाली अटक करत तुरुंगात पाठवलं. पण काही दिवसांनी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सायबर पोलिसांची मदत घेत महिलेचा मोबाईल ट्रॅक करण्याचा निर्णय घेतला.


सायबर पोलिसांनी त्या महिलेचा मोबाईल ट्रॅक केल्यानंतर ती महिला जालंधरमध्ये असल्याची माहिती मिळाली. याबाबत जालंधर पोलिसांना माहिती देण्यात आली. जालंधर पोलिसांनी या महिलेचा शोध घेत तिला अटक केली. त्यानंतर याप्रकरणाची सत्य परिस्थिती समोर आली.