अररिया : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. बिहारमधील अररिया येथील डबरा गावात हा अपघात झालाय. या अपघातात ६ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसोहळा संपल्यानंतर वऱ्हाड्यांना घेऊन गाडी गावाकडे परतत होती त्याच दरम्यान हा अपघात झाला. या गाडीमध्ये लहान मुलं होती. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने गाडी थेट तलावात जाऊन पलटी झाली. 


स्थानिक नागरिकांच्या मते, लग्नानंतर कुर्साकांटा येथील चिकनी गावाहून वऱ्हाड डोरियारी येथे येत होतं. मात्र, वऱ्हाडाच्या गाडींपैकी एका गाडीला डबरा गावाजवळ अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर गाडी झाडाला धडकली आणि त्यानंतर तलावात कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील सहा लहानग्यांचा जागीच मृत्यू झाला.


मृतकांच्या नातेवाईकांना चार-चार लाख रुपयांची मदत प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींची विचारपूस करण्यासाठी अररियाचे जिल्हाधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत. तर, अपघातग्रस्त गाडी तलावातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.