नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरांमध्ये लागोपाठ थोडी-थोडी वाढ होत आहे. त्यातच आता विरोधकांना सरकारच्या विरोधात चांगलंच हत्यार सापडलं आहे. काँग्रेसने वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांविरोधात 10 सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी म्हटलं की, 'महागाई जीव घेत आहे. पेट्रोल डिझेल कंबरडं मोडत आहे. जनता त्रस्त आहे. यामुळे 10 तारखेला भारत बंद राहणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपवर आंदोलन केलं जाणार आहे. मोदी सरकारमुळे कोणीच आनंदी नाही. मोदी सरकार राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर नाही देऊ शकत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोकांमध्ये आक्रोश आहे. काँग्रेसची बैठक झाली असून आणखी काही विरोधी पक्षांशी चर्चा सुरु आहे.'


काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटलं की, 'तेलामधून सरकारला 11 लाख कोटींची कमाई झाली. हा पैसा कोणाच्या खिशात गेला हे सरकार सांगत नाही. पेट्रोल डिझेल शिवाय एलपीजीचे दर देखील वाढले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मागणी करत आहे की, पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या अंतर्गत आणलं जावं. यामुळे 10 ते 15 रुपये कमी होतील.'