नवी दिल्ली : काँग्रेस पार्टीच्या लोकसभा निवडणुक 2019 च्या कॅम्पेनिंगला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस पार्टीने आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये वर्किंग कमिटीची महत्त्वाची बैठक घेतली. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्मृति भवनात झालेल्या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासहित पार्टीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातील प्रार्थनेत सहभाग घेतला तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गांधीजींच्या ऐतिहासिक दांडी मार्चच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्य समितीने आरएसएस आणि भाजपाच्या फासीवाद, द्वेष, राग आणि विभाजनच्या विचारधारेला हरवण्याचा संकल्प केला आहे. या प्रयत्नात कोणतेही बलिदान मोठे नाही. कोणताही प्रयत्न छोटा नाही. ही लढाई जिंकली जाईल' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. 




पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: पीडित असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात. पण जनता ही खरी पीडित असल्याचे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. राष्ट्रीय हितासोबत तडजोडी करून राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेस कार्यसमितीच्या या बैठकीत माजी पंतप्रधान यांनीही भाजपा सरकारवर टीका केली. जनतेला यूपीए सरकारची बाजू सांगण्याची गरज आहे. हे सरकार चुकीचा प्रचार करत आहे. चुकिच्या नितीमुळे अर्थव्यवस्था ढासळल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला आहे.