Crime News : लग्न समारंभात नाचणं एका महिलेच्या जीवावर बेतलं. पतीने केलेल्या मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झारखंडमधल्या चतरा इथं ही दुर्देवी घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चतरामधल्या लारकुवा गावात लग्नसमारंभा निमित्ताने नाचगाणं सुरु होतं. गावातील स्त्री-पुरुष डीजेच्या तालावर नाचत होते. यात शांतीदेवी नावाची महिलाही आपल्या पतीसोबत डान्स करत होती.  शांतीचा पती शीतल भारती दारूच्या नशेत होता. काही वेळ नाचल्यानंतर शांतीचा नवरा थकला तेव्हा त्याने पत्नी शांतीदेवीला घरी जाण्याचा हट्ट केला. पण शांतीला आणखी नाचायचं होतं. त्यामुळे रागावलेला पती शीतल भारती हा तिथून निघून गेला.


काठीने पत्नीला बेदम मारहाण 
कार्यक्रमानंतर सुमारे दोन तासांनी जेव्हा महिला घरी पोहोचली तेव्हा पती दरवाजा उघडण्यासाठी आला आणि उशीराचे कारण विचारलं, तेव्हा महिलेने आपण नाचत असल्याचं सांगितलं. त्यामुळे पतीचा पारा चढला. त्याने घरातून काठी आणील आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. काठिने त्याने पत्नीला बेदम मारहाण केली, यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.


पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव
पत्नीच्या मृत्यूने पती घाबरला, आपण पकडले जाऊ नये यासाठी त्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. यासाठी त्याने पत्नीचा मृतदेह छताला लटकवला. यानंतर त्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांना पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली.


पोलिसांनी लावला छडा
नातेवाईकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी शांतीदेवीचा मृतदेह खाली उतरवला. पण तिच्या शरिरावर मारहाणीच्या खूणा दिसल्या. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पती शीतल भारतीकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने पत्नीने आत्महत्या केल्याचं सांगितलं, पण पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. 


याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शीतल भारती याला अटक केली आहे.