नवी दिल्ली : देशात मंदी आहे पण ते मान्य करण्याचे धाडस मोदी सरकार करत नाही. मात्र, जागतिक मंदी असल्याचे सांगून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे, असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. परंतु देशात मंदी आहे. त्यातच आता आणखी एक चिंताजनक वृत्त हाती आले आहे. देशाचा जीडीपी वाढण्याऐवजी घटला आहे. त्यामुळे मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे भारताला आर्थिक मंदीचा फटका बसत आहे, हे स्पष्ट होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठवड्याभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन बँकांसंबधी महत्त्वपूर्ण घोषणा करावी लागलली. केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाच्या आर्थिक विकास दरात घसरण झाल्याची बाब पुढे आली आहे.


पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मध्ये विकासदर ५.८ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यावर घसरला आहे. देशाचा विकास दर घसरला असून गेल्या वर्षभरात यात जवळपास ३ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षातल्या अखेरच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान जीडीपी ५.८ टक्के होता. मात्र आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्क्यांवर आला आहे. 
गतवर्षी तो ८ टक्क्यांवर होता. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकासदर २ टक्के होता. तर बांधकाम क्षेत्रातील वृद्धीदर ७.१ टक्क्यांवरुन थेट ५.७ टक्क्यांवर खाली घसरला आहे. ही चिंताजनकबाब आहे. दरम्यान, गेल्या साडेसहा वर्षानंतर जीडीपी निचांकी पातळीवर आला आहे. देशात मागणी कमी झाल्याने तसेच गुंतवणुकीसाठी परिस्थिती चांगली नसल्याने जूनच्या तिमाहीत जीडीपीत घसरण पाहायला मिळेल, असा अंदाज आधीच बांधण्यात आला होता.