जयपूर : अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात भारत बंदमध्ये अनेक ठिकाणी हिंसा पाहायला मिळाली. सोमवारी दलित संघटनांनी विरोध प्रदर्शन केलं. ज्याला काही ठिकाणी हिंसेचं रुप आलं. आज या हिंसेचा विरोध करत राजस्थानमध्ये २ दलित नेत्यांचीच घरं जाळण्यात आली. करौलीमध्ये भाजपचे आमदार राजकुमारी जाटव यांचं घर आंदोलनकर्त्यांनी पेटवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४० हजार लोकांनी आमदारांच्या घरावर हल्ला करत करौलीमधील माजी मंत्री भरोसीलाल जाटव यांचं घर देखील पेटवलं. मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी भारत बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांनी अनेकर ठिकाणी हिंसा केली. बसमध्ये महिलांसोबत छेडछाड केल्याच्या घटना घडल्या. त्याचा विरोध करत आज संतप्त जमावाने दलित नेत्यांची घरं जाळली. याशिवाय एका शॉपिंग मॉलमध्ये देखील तोडफोड केली.



सोमवारी करौलीमध्ये बंद दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी काही लोकांना मारहाण देखील केली. या घटनेनंतर संपूर्ण शहरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली. अनेक एटीएम मशीन देखील यावेळी फोडण्यात आले. भारत बंद दरम्यान राजस्थानमध्ये गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला. काही पोलीस देखील जखमी झाले.