नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सरकार बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे. सगळ्याच राज्यांमध्ये भाजपची सत्ता जाताना दिसत आहे. भाजपच्या दिल्ली कार्यालयातही सध्या शुकशुकाट आहे. पण भाजपच्या नेत्यांना असं वाटतं की याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नाही. त्यातच भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दावा केला आहे की, 2019 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनतील. ते पंतप्रधान नाही झाले तर मी राजकारण सोडून देईल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेनेने भाजपवर टीका करत म्हटलं की, हा काँग्रेसचा विजय असल्याचं म्हणणं चुकीचं आहे. कारण हा लोकांचा राग आहे. आता भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते देखील वक्तव्य करण्यात पुढे येत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी म्हटलं की, हा निकाल भाजपसाठी वाईट बातमी आहे. जनतेने आपला निर्णय दिला आहे. पंतप्रधान मोदींना आता हे काळालं पाहिजे की, आश्वासनं देऊन काम नाही होणार. विश्वास मिळवण्यासाठी काम केलं पाहिजे. जनता भाजपच्या खोट्या आश्वासनांनी त्रस्त झाली आहे.


विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंत हाती आलेला निकाल पाहता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. या निकालांनंतर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. काँग्रेससाठी हे जोरदार कमबॅक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत यामुळे कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी उभाऱी मिळणार आहे.