नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०२वर पोहोचलीय. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ३१ रुग्ण आढळून आलेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताने सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवरील प्रवासी वाहतूक आजपासून बंद करण्यात आलीय. पुढच्या आदेशापर्यंत शेजारी देशांचा प्रवास बंद करण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलंय. पण सीमेवरील मोजक्याच पोस्टवर अत्यावश्यक गरजांसाठी वाहतूक सुरू राहणारेय. भूतान, नेपाळ, बांग्लादेश, म्यानमार या देशांमधून रस्तेमार्गे होणारी प्रवासी वाहतूक १५ मार्च मध्यरात्रीपासून तर पाकिस्तानबरोबरची सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ वर गेलीय. राज्यातल्या ९ शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. यात सर्वात जास्त रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठेत प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झालीय. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलीय. करोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारच करणार आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 


ज्या रुग्णांमध्ये सुधारणा होते आहे त्यांना घरी सोडण्यात येईल. कुठेही गर्दी होऊ नये म्हणून आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या रूग्ण संख्येत सध्या देशात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक रूग्ण केरळात आढळले आहेत. 



रोममधून ४९ भारतीय परतले


एल इटालीया विमान सेवेनं आज ४९ भारतीय मायदेशी परतले. या सर्वांना रोममधून भारतात आणण्यात आलंय. दिल्ली विमानतळावर त्यांना उतरवण्यात आलं. त्यानतंर त्यांची रवानगी छत्रपूर सेंटरमध्ये करण्यात आलीय. दरम्यान आज एअर इंडियाच्या विशेष विमानानं मिलानहून आणखी भारतीयांना मायदेशी आणलं जाणारेय. 



इटलीतील २२० भारतीयांना मायदेशी आणणार


इटलीत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विमान रवाना झालंय. आज सकाळी हे विमान इटलीत अडकलेल्या 220  भारतीयांना घेऊन परत येईल.. दिल्ली विमानतळावर आज या नागरिकांना उतरवण्यात येणार आहे. 



करोनाने मृत्यू झाल्यास ४ लाखांची नुकसानभरपाई


केंद्र सरकारने करोना व्हायरस ही आपत्ती घोषित केली आहे. करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबीयांना ४ लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. करोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं आपत्ती निधीचा उपयोग करू शकणार आहेत.