नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या ताफ्यात लवकरच T-90MS हे रणगाडे दाखल होणार आहेत. केंद्रीय सुरक्षा समितीने नुकताच हा प्रस्ताव मान्य केला. त्यानुसाऱ भारत रशियाकडून ४६४ रणगाडे खरेदी करेल. यासाठी १३,४४८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्या भारताच्या ताफ्यात रशियन बनावटीचे T-90S रणगाडे आहेत. मात्र, अत्याधुनिक अशा T-90MS रणगाड्यांमुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी वाढेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी- टेक्निकल कॉर्पोरेशनकडून (FSMTC) देण्यात आलेल्या माहितीनुसार, रशियाकडून भारताला यापुढेही T-90MS रणगाड्यांच्या निर्मितीसाठी सहकार्य केले जाईल. भारतीय लष्कराकडून या रणगाड्यांचे नामकरण भीष्म असे करण्यात आले होते. 


T-90MS रणगाड्यांमध्ये १२५ एमएमच्या गनसह अद्यायावत वेपन स्टेशन आहे. याशिवाय, या रणगाड्यांमध्ये असणाऱ्या स्वयंचलित डिजिटल फायरिंग प्रणालीमुळे (एफसीएस) शत्रुचा आणखी अचूकपणे वेध घेता येईल. तसेच या प्रणालीमुळे दिवसा आणि रात्रीही लक्ष्याचा शोध घेऊन ते नष्ट करता येणे शक्य होणार आहे.


काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीची धनुष तोफ दाखल झाली होती. Ordnance Factory Board यांच्याकडून 'धनुष' या स्वदेशी तोफांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे. ही तोफ ३६० अंशाच्या कोनात फिरून ३८ किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्याचा वेध घेऊ शकते.