Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सप्टेंबर महिन्यात सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) प्रवास आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. देशाच्या दक्षिण टोकाकडून सुरू झालेला हा प्रवास आता थेट उत्तरेपर्यंत पोहोचला आहे. या मोठ्या प्रवासामध्ये देशातील अनेक राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा त्यांनी ओलांडल्या. अनेकांनी त्यांना या यात्रेत साथ दिली. याच प्रवासात अनेक वळणं अशीही आली, जिथं राजकारणापलीकडले राहुल गांधी सर्वांनाच पाहायला मिळाले. त्यातलंच एक वळण सर्वांसमोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युट्यूबवरून याच वळणाचा एक व्हिडीओ (Rahul Gandhi Video) पोस्ट करण्यात आला. जिथं जेवणाच्या ताटावर बसूनच ते अनेक मुद्द्यांवर दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहेत. अगदी स्वत:च्या लग्नाविषयीसुद्धा. 


हेसुद्धा वाचा : ए आई...! राहुल गांधींमधलं लहान मूल जेव्हा जागं होतं... सोनिया गांधींसोबतचा गोड Video तुम्ही पाहिला?


एका मुलाखतीदरम्यान आपल्या आवडीनिवडींवर राहुल गांधी यांनी गप्पा मारल्या. (Kerala) केरळमध्ये कशाचीही तमा न बाळगता पोहण्यापासून आपण फ्लोरिडामध्ये स्कुबा डायव्हिंगचं ट्रेनिंग देत होते, याचा रंजक खुलासाही त्यांनी केला. पोहणं हाच मुळात आपला छंद असल्याचं सांगत मी पाण्याखाली बराच वेळ श्वास रोखून ठेवू शकतो असंही ते कुतूहलानं म्हणाले. 


खाण्यापिण्याच्या आवडी आणि राहुल गांधी... 


जेवणाच्या सवयींमध्ये आपण Carbohydrates शक्यतो टाळतो असं सांगताना त्यांनी भात आणि चपाती या पदार्थांना दूरच ठेवलं. त्याऐवजी (Fish, Chicken, Mutton) मासे, चिकन, मटण, तंदुरमध्ये तयार करण्यात आलेले पदार्थ यांना आपली विशेष पसंती असल्याचं सांगितलं. गप्पांच्या ओघाओघात त्यांनी दिल्लीतील आपल्या आवडत्या हॉटेल्सची नावंही संगितली जिथले पदार्थ त्यांना प्रचंड आवडतात. यामध्ये मोती महल, सागर, स्वागत, सर्वान्न भवन या ठिकाणांची नावं त्यांनी घेतली. 


पहिला पगार आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी करणारे राहुल गांधी 


एका सधन कुटुंबातील असूनही राहुल गांधी यांनी नोकरी करण्याला प्राधान्य दिलं होतं. लंडनमध्ये त्यांनी मॉनिटर नावाच्या एका स्ट्रॅटेजिक कन्स्ल्टींग कंपनीमध्ये नोकरी केली होती. इथं त्यांना वयाच्या 25 व्या वर्षी 3000 पाऊंड इतका पगार मिळाला होता. त्यावेळी इतका पगार त्यांच्यासाठी जास्तच होता. ज्याचं त्यांना आजही कौतुक वाटतं. 


मी पंतप्रधान झालो तर.... 


मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आपण पंतप्रधानपदी आल्यास काही गोष्टी बदलू, काहींना प्राधान्यस्थानी आणू असं त्यांनी स्पष्ट केलं. शिक्षणसंस्था बदल करण्यापासून (Small Scale business) लघुउद्योगांना अधिक प्राधान्य देईन असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. समाजातील ज्या घटकांना सध्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्यांना साथ देईन असं सांगताना देशातील (Farmers) शेतकरी वर्ग, तरुण पिढी आणि बेरोजगार तरुणांना अपेक्षित संरक्षण देईन असं आश्वासक वक्तव्य त्यांनी केलं.  



राहुल गांधी लग्नासाठी तयार, पण... (Rahul Gandhi wedding plans )


संपूर्ण भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना एकच प्रश्न विचारण्यात येत होता. तो म्हणजे त्यांच्या लग्नाचा. वेळोवेळी त्यांनी लक्षवेधी उत्तरंही दिली. पण, यावेळी ते जरा आणखी स्पष्ट बोलले. लग्नासाठी माझ्या अपेक्षा जरा जास्त आहेत, कारण माझे आई- वडील उत्तम वैवाहिक आयुष्य जगले. सध्या मुलगी कशी हवी अशा साचेबद्ध अटी नाहीत. पण, एखादी हुशार मुलगी जोडीदार म्हणून आवडेल अशी अपेक्षा त्यांनी नकळत व्यक्त केली.