नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल समोर आल्यानंतर विरोधकांच्या महाआघाडीला गळती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी दीड वाजता विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीला २१ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या बैठकीतून कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी माघार घेतली आहे. त्यांचा आजचा दिल्ली दौरा काहीवेळापूर्वीच रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्याऐवजी प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता एक्झिट पोलची आकडेवारी पाहून महाआघाडीतील राजकीय पक्ष अशाचप्रकारे बाहेर पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, सपाचे नेते अखिलेश यादव यांनी यापूर्वीच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या महत्त्वाच्या नेत्यांअभावी या बैठकीला कितपत अर्थ उरणार, याबद्दल अनेकांना शंका आहे.


लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर रविवारी प्रसारमाध्यमे आणि विविध संस्थांकडून मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल जाहीर करण्यात आले होते. यापैकी बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येईल, असे भाकीत वर्तवले होते. यानंतर साहजिकच भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले होते. तर विरोधकांच्या गोटात मात्र शांतता पसरली होती. 



मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवर अजिबात विश्वास ठेवू नका, असे सांगितले होते. निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत विरोधकांनी एकीने आणि खंबीर राहिले पाहिजे, असे ममतांनी म्हटले होते.