बंगळुरु : काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी आमदार वाचवण्याचा आटापिटा सुरू केलेला असला, तरी काँग्रेसचे किमान चार आमदार भाजपच्या गळाला लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेल्लारी जिल्ह्यातल्या विजयनगर आणि कडलगीचे दोन आमदार कालपासून काँग्रेसच्या गटात नाहीत. आनंद सिंह आणि नागेंद्र अशी त्यांची नावं आहेत. त्याचप्रमाणे प्रतापगौडा पाटील, आणि एम वाय पाटील हे दोन आमदारही काँग्रेसला दगा फटका करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय जेडीएसचेही काही आमदार पक्ष सोडून भाजपामध्ये सामील होतील, अशी भाजपला  आशा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा सांगत आहेत आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकणार? 


बहुमतासाठी मोठी कसोटी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकच्या रणसंग्रामात आज ४ वाजेपर्यंत भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी ही भाजपची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत सत्ताधारी भाजपला दणका दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा आज बहुमत सिद्ध कसं करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. भाजपकडे संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्याने काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आजच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सत्ताधारी भाजपला दिलेत. कर्नाटकाच्या मुख्यंमंत्रीपदाची शपथ घेऊन जेमतेम २४ तास पूर्ण होत असताना येडियुरप्पांच्या खुर्चीवर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलावर कायम आहे. तर आज विधानसभेत बहुमत सिद्ध करू असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलंय.


हंगामी सभापती पदावरुनही काँग्रेस आक्रमक


कर्नाटकातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे येडीयुरप्पां यांच्या वरुन वाद सुरु असतानाच आता हंगामी सभापती पदावरुनही काँग्रेस आक्रमक झालीय.  भाजपचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष के जी बोपय्या यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. राज्यपालांनी के जीबोपय्या यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिलीय. अनेक ज्येष्ठ आमदार असतानाही त्यांना डावलून बोपय्यांना अध्यक्ष केल्यामुळे काँग्रेस संतप्त झालीय.  सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी पुन्हा काँग्रेसने धाव घेतलीय.  सर्वोच्च न्यायालयानं सर्वात ज्येष्ठ आमदाराला अध्यक्षपदी बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याचे पालन न केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. या संदर्भातील सुनावणी ही सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.