Durga Puja Pandal : देशभरात मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यासह देशभरात उत्साहात दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला आहे. कोलकातामध्ये देवीच्या मंडपामध्ये (Kolkata Durga Puja Pandal) वेगवेगळ्या थीमवर बनवलेले डेकोरेशन देवी भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. मात्र एका देवीच्या मंडपात केलेल्या डेकोरेशनमुळे ते पाहायला आलेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली आहे. लोकांच्या एका चुकीमुळे नवरात्रोत्सव मंडळाचेही टेन्शन वाढलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचा थाट वेगळा असतो. देशभरात दुर्गापूजा मंडप उभारले जातात पण बंगालची गोष्ट वेगळी आहे. नऊ दिवस सजवल्या जाणाऱ्या या मंडापामध्ये सजावट सर्वात महत्त्वाची असते. आपलं डेकोरेशन वेगळे बनवण्यासाठी कोलकात्यातील प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळ झटत असते.  कोलकाता येथील एक मंडप सुमारे 600 पाणीपुरी लावून सजवण्यात आले होते. मात्र या डेकोरेशनमुळे मंडळाच्या अडचणीत वाढ झाली आहे.


मंडपातील हे आकर्षक डेकोरेशन पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र मंडपामधून सर्व पाणीपुरी गायब असल्याचे पाहून हे डेकोरेशन करणाऱ्यांना चांगलाच धक्काच बसला आहे. बेहाला नतुन दल यांनी ही सजावट केली होती. मात्र पाणीपुरी गायब असल्याचे पाहून त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. कारण त्या पाणीपुरी मंडपात लावण्याआधी त्यावर केमिकल लावण्यात आले होते. पाणीपुरी चमकण्यासाठी हे केमिकल त्यावर लावण्यात आले होते. मात्र त्या सगळ्या पाणीपुरी खाल्ल्याने ते खाणारे लोक आजारी पडण्याची भीती मंडळाच्या लोकांना आहे.


बेहाला नतुन दल यांनी सांगितले की, गायब झालेल्या बहुतेक पाणीपुरी या सालच्या पानांवर चिकटवल्या होत्या. देवीच्या मूर्तीसमोर पाणीपुरीचे 15 थर तयार करण्यात आले होते. याशिवाय काही पाणीपुरी डब्यात ठेवण्यात आले होती. त्यामुळे त्या लोकांच्या हाती लागल्या नाहीत. मात्र, काहींनी तर देवीच्या मूर्तीला अर्पण केलेल्या पाणीपुरीदेखील उचलून गायब केल्या.


पूजा मंडळाचे आयोजक संदीपन बॅनर्जी म्हणाले की, लोक पाणीपुरी खातील याची आम्हाला आधीच भीती वाटत होती. त्यामुळे पाणीपुरीमध्ये केमिकल असल्याचं आम्ही सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. लोकांनी पाणीपुरी खाऊ नये, अशी घोषणाही मंडपामध्ये करण्यात आली होती. सजवलेली पाणीपुरी पूजेच्या शेवटी कुरकुरीत दिसण्यासाठी त्यावर केमिकल लावण्यात आले होते. आम्ही एका व्यक्तीला पाणीपुरी उचलताना पाहिले होते, पण तो खाईल असे वाटले नव्हते. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याला आम्ही ते खाताना पाहिलं. हे खाल्ल्याने लोकांना आजार होऊ शकतात.



"मला आशा आहे की ही पाणीपुरी फार कमी लोकांनी खाल्ली असतील. काही लोकांनी ही पाणीपुरी खरी आहे की खोटी हे पाहण्यासाठी काढल्या होत्या. इतकी पाणीपुरी खाऊन कुणालाही त्या खाव्याश्या वाटल्या असतील. पण आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही लोकांना त्यापासून दूर ठेवण्यास सांगितले होते," असेही संदीपन बॅनर्जी म्हणाले.