कोलकाता : lok sabha results 2019 लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे कल हाती येण्यास सुरुवात झाल्यापासूनच देशात सत्ता नेमकी कोणाची येणार याविषयीचं चित्र स्पष्ट दिसू लागलं होतं. गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या मतमोजणीची एकूण आकडेवारी पाहता संपूर्ण देशातच भाजपाची लाट असल्याचं पाहायला मिळत आहे. काही अनपेक्षित निकालही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगाल सरकारलाही भाजपाच्या या वादळामुळे फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला आलेलं हे अपयश पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणाच्या पटलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हार मिळत असतानाचं चित्र दिसत असतानाच बॅनर्जी यांनी एक लक्षवेधी ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी विजेत्याचं अभिनंदन केलं आहे. सोबतच निवडणुकीमध्ये पराजयाचा सामना करावा लागणाऱ्यांसाठीही त्यांनी एक संदेश लिहिला आहे. पराजयाचा सामना करणारे सर्वचजण पराभूत झालेले नसतात, असं त्यांनी ट्विट करत लिहिलं आहे. 


परिस्थितीचं चौफेर आणि सखोल परीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हणत मतमोजणीची प्रक्रिया संपण्याची आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांची आकडेवारी यांच्यात साम्य आढळून येण्याची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.



पश्चिम बंगालमध्ये गेल्या ताही दिवसांपासून सुरू असणाऱ्या चर्चा आणि एकंदर परिस्थिती पाहता मतदारांचा कल हा भाजपच्या दिशेने जाण्याची बरीच कारणं समोर येत आहेत. २०१४ मध्ये भाजपाला ममता दीदींच्या या बालेकिल्ल्यात फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. पण, यंदाच्या निकालात मात्र भाजपाने चांगलीच मुसंडी मारली आहे. २२ जागांवर भाजपाकडे आघाडी असल्यामुळे तृणमूलला हा मोठा धक्का आहे.