तिरुवअनंतपूरम :  loksabha election 2019 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडीला संपूर्ण देशाच राजकीय वारे वाहत आहेत. मंगळवारी मतदान प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील विविध भागांमध्ये मोठ्या उस्ताहात मतदारांनी पुढे येत मत दिल्याचं पाहायला मिळालं. केरळमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत पन्नास टक्क्यांहून जास्त मतदान झालं असून, दिवस पुढे जात असतानाच मतदारांचा उत्साहसुद्धा पाहण्याजोगा आहे. पण, या प्रक्रियेत गालबोट लागल्याची माहितीही समोर येत आहे. काही मतदार आणि मतदान केंद्रावर असणारे अधिकारी या प्रक्रियेदरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोसळून पडल्याची माहिती 'द न्यूज मिनिट'ने प्रसिद्ध केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोसळून पडलेल्यांपैकी जवळपास सहा मतदारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल केल्याचं कळत आहे. केरळात २० मतदार संघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे, ज्यामध्ये काही ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजण्यापूर्वीच मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. केरळमध्ये सध्याच्या घडीला काही ठिकाणी पावसाच्या सरींचा हलकासा शिडकावा झाला असला तरीही बऱ्याच भागांमध्ये प्रचंड उकाडा आहे, ज्यामुळे मतदारांना वातावरणातील या बदलाचाही सामना करावा लागत आहे. 


लोकशाहीचा हा जागर सुरू असतानाच, कन्नूर मतदारसंघात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मतदार केंद्रातून घरी परतल्यावर वेणूगोपाल मरार हे त्यांच्या घराच्या दिशेने निघाले. घरी पोहोचताच तोल जाऊन ते पडले. ज्यानंतर त्यांना जवळच्याच रुग्णालयातही नेण्यात आलं. पण, त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. 


कोल्लम मतदारसंघात मणी नावाच्या ६३ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचं कळत आहे. एरवीपूरम मतदारसंघातील किलिकोल्लूर एलपी स्कूल येथे मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव नसल्याविषयी ते संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. तेव्हाच तोल जाऊन ते पडले. पण, रुग्णालयात नेतेवेळीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती 'टीएनएम'ने प्रसिद्ध केली आहे. मुडोली विजयी (६५), थ्रेसियाकुट्टी (८७), चॅको मथई (८६) यांचाही मृत्यू झाल्याचं कळत आहे. त्यामुळे एकंदरच मतदान प्रक्रियेला केरळातील काही मतदार संघांमध्ये गालबोट लागलं आहे.