भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये जवळपास पंधरा वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालेय. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साह आहे. तर भाजपची सत्ता गेल्याने भयान शांतता आहे. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजधानी भोपाळमधील श्यामला हिल्स इथे असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर कहीं ख़ुशी, कहीं गम असं वातावरण पाहायला मिळत आहे. तर एकीकडे शिवराज सिंह यांच्यासाठी ममत्व भावना असलेल्या व्यक्तींच्या भावनांचा बांध फुटत आहे तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासाबाहेर बाहेर मोठ्या काळानंतर पक्षाच्या झेंड्यांसह शक्तीप्रदर्शन करीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान, मध्य प्रदेशाच्या निकालात सर्वात जास्त अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. काँग्रेसने बाजी मारली तरी एकहाती सत्ता स्थापन करता आलेली नाही. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ११६च्या जादुई आकड्यापर्यंत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना पोहोचता आलेलं नाही. तब्बल २४ तासांनी मतमोजणी आटोपली. काँग्रेसने ११४ जागांवर विजय मिळवलाय तर भाजपचे १०९ आमदार निवडून आले आहेत. समाजवादी पक्षाच्या एका आमदारनं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. तसेच बसपानेही पाठिंबा केलाय. बसपाचे दोन आमदार आहेत. अपक्ष चार आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा काँग्रेसने केलाय. त्यामुळे आता काँग्रेसकडे एकूण १२१ आमदार आहे.


 


काँग्रेस मध्यप्रदेशात सत्ता स्थापन करणार आहे. दुपारी चार वाजता आमदारांची बैठक सुरु झालेय. त्यात विधीमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात येईल. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच लक्ष आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे कमलनाथ यांना राज्यात परत पाठवतात की ज्योतिरादित्य शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकणार यावरून सध्या भोपाळमध्ये जोरदार चर्चा रंगतेय.