धुळे : पंतप्रधान  नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी फक्त चार तास झोप घेत असल्याचा दावा करतात. तर मग  शेतकऱ्यांनी आत्महत्या  का केल्या ? बेरोजगारांना नोकऱ्या का मिळाल्या नाही ?, सर्वसामान्यांच्या खात्यावर १५ लाख रुपये का जमा झाले नाही ?  असे प्रश्न उपस्थित करून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदींचा दावा फोल ठरविला. धुळे लोकसभा  मतदार संघातील  बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार नबी अहमद  यांच्या प्रचारासाठी ओवेसी हे मालेगाव येथे आले होते. यावेळी आयोजित प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवर टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगाव  बॉम्बस्फोटांतील मुख्य आरोपी आणि शाहिद हेमंत करकरे  यांचा  अवमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंहला उमेदवारी देणाऱ्या पक्षाला जनताच   त्यांची जागा  दाखवेल असा विश्वास खा.ओवेसी यांनी व्यक्त केला. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील व वारीस पठाण यांनीही विविध मुद्द्यांवर भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली.



पबजी खेळले का ?



याआधीही असदुद्दीन ओवेसी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी 5 वर्षे देश चालवत होते की पबजी खेळत होते ? असे ट्वीट त्यांनी पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हॅंडल टॅग केले. पंतप्रधान मोदींनी त्यांची एअरफोर्स पाठवून पाकिस्तानचे दहशतवादी कॅम्प नष्ट केल्याचा पुनरोच्चार भाजा अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या सभेत केला होता. या वक्तव्यावरून त्यांनी समाचार घेतला. मोदींचा न्यूक्लियर बॉम्ब, मोदींची एअरफोर्स, 5 वर्षात जे काही देशाचे होते ते मोदींचे झाले आहे. पंतप्रधान मोदी देश चालवतात की पबजी खेळतात ? असा टोला ओवेसी यांनी लगावला.