नवी दिल्ली : जमिनीच्या वादातून ग्रामस्थांनी हद्दच पार केल्याचं उघडकीस आलं आहे. बिहार मधील कटिहार येथील जमिनीच्या वादानंतर एका संपूर्ण परिवाराला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, मुलांचे आई-वडिल हे गंभीर जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 


कटिहारमधील आजमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घोरदह गावात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कटिहारच्या पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अब्दुल रहमानसह इतरांवर हे क्रुर कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दाम्पत्य हे वादग्रस्त जागेपासून हाकेच्या अंतरावर चहाचं दुकान चालवतात. जमिनीच्या वादानंतर गावातील काही तरुणांनी दबंगगिरी दाखवत रविवारी रात्री उशिरा घरात प्रवेश केला. यावेळी घरात झोपलेले सज्जन दास आणि त्यांच्या पत्नीसह दोन मुलांना घरात लॉक करुन पेटवून दिलं.


या प्रकरणी पोलिसांनी दावा केला आहे की, इतर फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. तर, पीडित परिवाराच्या नातेवाईकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आम्हाला सरकार आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.