नवी दिल्ली : काँग्रेस नेता नवज्योत सिंह सिद्धू यांनी परराष्ट्र मंत्रालयाला तिसऱ्यांदा पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी करतारपूर कॉरिडोरच्या उद्धाटन समारंभात सामिल होण्याची परवानगी मागितली आहे. सिद्धू यांनी पत्रात लिहिलं आहे की, मला उद्घाटनासाठी परवानगी देण्यात आली आहे की नाही, याबाबत अनेकदा रिमाइंडर दिल्यानंतरही मला कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९ नोव्हेंबर रोजी इम्रान खान करतारपूर कॉरिडोरचं उद्धाटन करणार आहेत. करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन समारंभात सामिल होण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून, काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. 


सरकारने काँग्रेस नेता नवज्योत सिंह सिद्धू यांना करतारपूरला जत्थ्यासोबत जाण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु पाकिस्तानला जाण्यासाठी परवानगी दिलेली नाही.


सिद्धू यांनी पत्रात लिहिले की, मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, सरकारला काही समस्या असल्यास आणि त्यांनी मला जाण्यासाठी मंजूरी न दिल्यास मी जाणार नाही. परंतु सरकारने माझ्या तिसर्‍या पत्राला उत्तर न दिल्यास मी शीख भक्तांसोबत पाकिस्तानला जाणार, असं ते म्हणाले.


याआधी नवज्योत सिंग सिद्धू यांनी (Navjot Singh Sidhu) परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पत्र लिहून पाकिस्तानात करतारपूर कॉरिडोरच्या (Kartarpur corridor) उद्धाटन समारंभात जाण्यासाठी परवानगी मागितली होती.


  


माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे भारतातून करतारपूरला जाणाऱ्या ५७५ यात्रेकरुंपैकी एक आहेत. केंद्र सरकारने २९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या ५७५ यात्रेकरुंची यादी जाहीर केली आहे.