मुंबई : ऑक्सिजनचा पुरवठा वेळीच न झाल्याने ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर रूग्णालयात घडली. ही घटना म्हणजे अपघात नव्हे तर, हत्या आहे, असा संताप कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केला आहे. कैलाश सत्यार्थी हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. आपल्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत सत्यार्थी यांनी हा संताप व्यक्त केला आहे. हा संताप व्यक्त करतानाच स्वातंत्र्याच्या ७० वर्षांचा हाच अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलाश सत्यार्थी यांनी आणखी एक ट्विट केले आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी निर्णायक हस्तक्षेप करावा, जेणेकरून दशकभरापासूनची भ्रष्ट आरोग्य व्यवस्था ठिक होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गोरखपूरमधील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आतापर्यंत लहान मुलांसह ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.


दरम्यान, या घटनेनंतर योगी सरकारव विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला असून, तिव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या घटनेला सरकार जबाबदार आहे. असा आरोप करत योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी कॉंग्रेस आणि बसपने केली आहे.