नवी दिल्ली : एअर इंडियाच्या दिल्ली - राजकोटसाठी उड्डाण घेणाऱ्या विमानाचं 'ओव्हरबुकींग' करण्यात आल्याचं उघड झालंय... शुक्रवारी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर काही प्रवाशांना हातात तिकीट असूनही विमान प्रवास करण्यापासून रोखण्यात आलं. विमान कंपनीनं सायंकाळी जवळपास पाच वजता राजकोटहून उड्डाण भरणाऱ्या आपल्या एका विमानात प्रवाशांना जागा नसल्यामुळे विमानात प्रवेश नाकारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही पृष्टी केलीय. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी चूक झाल्याचं मान्य केलं... तसंच याचा फटका दोन प्रवाशांना बसल्याचंही सांगितलं. परंतु, या प्रवाशांना दुसऱ्या एका विमानातून त्यांचा प्रवास करता येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 


या घटनेनंतर एअरपोर्ट टर्मिनलवर या घटनेचा  निषेध करत काही नागरिकांनी आंदोलन केल्याचंही समजतंय. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  शेवटच्या क्षणी तिकीट रद्द झालं तरी विमानाच्या संपूर्ण प्रवासी क्षमतेचा वापर केला जावा यासाठी १० टक्के अतिरिक्त बुकिंगची परवानगी आहे. परंतु, या विमानातील सर्व प्रवासी दाखल झाल्यानं कंपनीला या समस्येचा सामना करावा लागला.