देहरादून : यंदाच्या वर्षी चारधाम यात्रेदरम्यान, केदारनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या विक्रमी आकड्याची नोंद करण्यात आली आहे. २०१३ मध्ये आलेल्या महाप्रलयानंतर या श्रद्धास्थळावर आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद ठरत आहे. सहा महिन्यांच्या या यात्रेला २०१८ मध्ये ७ लाख ३२ हजार भाविकांची उपस्थिती होती. यंदाच्या वर्षी हा आकडा वाढला असून, अवघ्या ४५ दिवसांतच तो ७ लाख ३५ हजारांवर पोहोचला आहे. आता येत्या काळात हा आकडा आणखी कोणती उंची गाठतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केदारनाथ मंदिराला भेट दिली होती. परिणामी या यात्रेला येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यामध्ये तरुणाईचा सहभागही वाखाणण्याजोगा आहे. 


पुन्हा संकट ओढावण्याची शक्यता 


२०१३च्या महाप्रलयानंतर केदारनाथ मंदिर परिसर अथक परिश्रमांच्या बळावर पुन्हा एकदा तग धरु लागला आहे. पण, जवळपास सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा या आपत्तीचं मुख्य कारण ठरलेला चोराबाडी ताल पुनरुज्जिवीत झाल्याचं म्हटलं जात आहे. याविषयीच्या कोणत्याही वृत्ताला अधिकृत स्तरावर दुजोरा देण्यात आलेला नाही. 


काय आहे नेमकं प्रकरण? 


काही दिवसांपूर्वी केदारनाथ धाम परिसरापासून जवळपास ५ किमी अंतरावर ग्लेशियरमध्ये तयार झालेला एक तलाव हा चोराबाडी ताल असल्याचा दावा आरोग्य शिबिरातील डॉक्टरांनी केला. चोराबाडी तालच्याच भागात आणखी एक तलाव तयार झाला असून, त्याचा आकार वाढतच आहे. ही बाब आढळताच याविषयीची माहिती वाडिया इंन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीच्या वैज्ञानिकांना देण्यात आली. ज्यानंतर हालचालींना वेग आला. मुख्य म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य पाहता योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. कारण, वेळीच लक्ष न दिल्यास पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागू शकतो. 


जवळपास २५० मी लांबी आणि १५० मी. रुंदी असणाऱा ता तलाव पाऊस, वितळणारा बर्फ आणि हिमस्खलनाच्या कारणांमुळे पूर्णपणे भरला आहे. २०१३च्या महाप्रलयानंतर या कलावाची पाहणीही करण्यात आली. पण, तो पुनरुज्जिवित होणार नसल्याचीच बाब त्यांनी सर्वांसमोर ठेवली होती.