अहमदाबाद: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी राज्यसभेसाठी गुजरातमधून उमेदवारी अर्ज भरला. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर  गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्यात. त्यापैकी एका जागेसाठी एस जयशंकर तर दूसऱ्या जागेसाठी जुगलची माथुरजी ठाकोर यांचे नाव निश्चित झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी एस. जयशंकर यांनी भाजपचे कार्य़कारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात एस. जयशंकर यांचा समावेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यापूर्वी त्यांनी पराराष्ट्र खात्याच्या सचिवपदाची जबाबादारी सांभाळली होती. जयशंकर यांनी ३० मे रोजी सरकारच्या इतर सदस्यांबरोबर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे परराष्ट्र खात्याची धुरा सोपवण्यात आली. 


मात्र, एस. जयशंकर संसदेचे सदस्य नसल्याने त्यांना सहा महिन्यात लोकसभा किंवा राज्यसभा एका सभागृहात निवडून जाणे आवश्यक आहे. त्यामुळे एस. जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. १९७७ च्या आयएफएस बॅचचे अधिकारी असलेल्या जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयात विविध पदांवर काम केलेले आहे.


जयशंकर यांनी अमेरिका आणि चीनसारख्या महत्वपूर्ण देशांमध्ये भारतीय राजदूत म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. भारत-चीन यांच्यातील डोकलाम वादही त्यांनी कौशल्याने हाताळला होता. ते जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ या कालावधीत परराष्ट्र सचिव होते.