नवी दिल्ली : शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना निवडणूक आयोगाने नोटीस धाडली होती. या नोटीसला आता प्रज्ञा सिंह यांनी उत्तर दिले आहे. मी शहीद करकरेंचा अपमान केला नाही असे त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटीसच्या उत्तरात म्हटले.  मी कोणताही राजकीय कार्यकर्त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही म्हटले नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भाजपने त्यांना भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या उमेदवारीवर अनेकांना प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते. साध्वी यांच्या या विधानाने देशभरात मोठी खळबळ माजली. अनेकांनी साध्वी प्रज्ञा आणि भाजपवर सडकून टीकाही केली होती.  आमच्यासाठी करकरे शहीदच आहेत. साध्वी यांचे मत वैयक्तिक आहे. कदाचित तुरुंगात असताना भोगाव्या लागलेल्या शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टांमुळे त्या अशाप्रकारे व्यक्त झाल्या असाव्यात, अशी सारवासारव भाजपने केली होती.


'पीडा समजून घ्या'



. 'ज्याप्रकारे एका महिलेला यातना देण्यात आल्या, तिची प्रतारणा करण्यात आली... ते कोणत्याही कायद्यात बसत नाही. साध्वीची भावना-पीडा तुम्ही समजून घ्यायला हवी... ठिक आहे, २६/११ च्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले पण त्यांचं नाव नेहमीच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीत चर्चेत राहिलं... परंतु, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहीत यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याची किंमत चुकवावी लागली' अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.