मुंबई : अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनाही अजित पवारांच्या मनधरणीसाठी स्वत:चा हट्ट बाजूला ठेवायला तयार आहे. रविवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. चर्चेचे मूळ होते ते अजित पवार. अजित पवारांचे मनधरणीचे प्रयत्न राष्ट्रवादीतल्या दिग्गज नेत्यांनी केले. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे आता शिवसेनेने अजित दादांच्या मनधरणीसाठी ब्रह्मास्त्र वापरायचे ठरवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित दादांच्या अशा वागण्याबाबत उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आणि अजितदादांसाठी स्वत:चा हट्ट बाजूला ठेवण्याचेही ठरवले आहे. जर पवारांनी म्हटले आणि काँग्रेसला मंजूर असेल तर पाच वर्षांऐवजी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेना स्वीकारायला तयार झाली आहे आणि उरलेली अडीच वर्ष अजित पवारांना मुख्यमंत्रिपद देता येईल असे मत उद्धव ठाकरेंनी मांडल्याचे म्हटले जात आहे. मात्र पहिली अडीच वर्ष ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील अशी अट उद्धव ठाकरेंनी ठेवली आहे.



या ऑफरबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया काय होती हे जरी कळू शकलेले नसले तरीही उद्धवच्या अशा ऑफरमुळे शिवसेना पूरती फसल्याचे चित्र आहे. कारण जर युती तुटली नसती तर सेनेकडे बऱ्याच जमेच्या बाजू होत्या- केंद्रातले एक मंत्रिपद, महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्रिपद, सत्तेत अर्धा वाटा, ३० वर्षांपासून असलेली युती. हे सगळं मिळत असतानाही केवळ भाजपपेक्षा अर्ध्या जागा मिळवून ज्या मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरत, युती तोडत महाविकास आघाडी करण्याचे ठरवले तिथेच शिवसेना फसली आणि तेलही गेलं, तूपही गेलं हाती राहील धुपाटणे अशीच गत झालेल्या शिवसेनेला आता फक्त अडीच वर्ष जरी मुख्यमंत्रिपद मिळाले तरी समाधान मानावे लागेल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन आमदार पक्षात परत आले आहेत. अनिल भाईदास पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ हे तिघेही दिल्लीहून मुंबईला परत आले आहेत.  गुडगावमधल्या हॉटेल हयातमध्ये या आमदारांना ठेवण्यात आलं होतं. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया धुगन यांनी या आमदारांना मुंबईत आणलं. अजित पवारांसोबत आता केवळ पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे आहेत.त्यामुळे अण्णा बनसोडेही पक्षात परतणार की अजित पवारांसोबतच राहणार याकडे लक्ष आहे.