नवी दिल्ली : राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने 'शिवराज्याभिषेका'वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. चित्ररथ बांधणीसाठी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील टीम दिल्लीत दाखल झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन इंडियागेटवरील राजपथावर देशातील १४ राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहे. देशभरातून एकूण ३० राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. त्यापैंकी विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील १४ राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राच्यावतीने प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. दरवर्षी राजपथावर २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुणे यांच्यासह गणमान्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलानात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने 'शिवराज्याभिषेक' दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे. 


राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती जे.जे.स्कुल ऑफ आर्ट चे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले आहे. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखना चित्ररथ उभारला जात असून या चित्ररथाच्या बांधणीचे कार्य येथील कॅन्टॉनमेंट भागातील रंगशाळेत सुरु आहे. चित्ररथावर रायगड किल्यावर असलेली ‘मेघडंबारी’ उभारण्यात येणार असून शिवराज्याभिषेक दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीकेतील कलाकारासह चित्ररथावर एकूण 10 कलाकार असतील. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला विविध प्रतिमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा दर्शविण्यात येणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणा-या गिताची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.


महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. यापूर्वी १९८० मध्येही राज्याच्यावतीने 'शिवराज्याभिषेक' दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शित केला होता यास प्रथम पारितोषीक मिळाले होते. 1983 मध्ये 'बैल पोळा' या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर १९९३ ते १९९५ असा सलग तीन वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित 'पंढरीची वारी' या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला ही उल्लेखनीय बाब आहे.