पाटणा : पाच महिन्याच्या आतच लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी पत्नीसोबत घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात रितसर अर्ज दाखल केल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय. तेजप्रताप यादव बिहारमधील बोधगयाच्या एका हॉटेलमधून काल रात्री अचानक गायब झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजप्रताप यादव आपली सर्व सुरक्षा कवचं भेदून गायब झाले. रागाच्या भरात ते काल रात्री अचानक हॉटेलच्या मागच्या दरवाजानं बाहेर पडले. 


सुरक्षा रक्षकांना न सांगताच तेजप्रताप निघून गेल्यानं एकच खळबळ उडाली. 


रांचीच्या तुरंगात लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यावर तेजप्रताप पाटण्याला परत येत असताना रविवारी बोधगयामध्ये थांबले होते.


सोमवारी ते पाटण्याला जाणार होते. त्यानुसारच ते सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पाटण्यात गेल्याचं आता पुढे आलंय. 



 


ऐश्वर्यावर आरोप


आपल्या कुटुंबीयांनी आपला विवाह राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप तेजप्रताप यांनी केला आहे. आपला या लग्नाला विरोध होता पण घरच्या व्यक्तींनी आपलं ऐकलं नाही आणि जबरदस्तीनं हा विवाह घडवून आणला. 


दरम्यान, हनीमूनवरून तेजप्रताप आणि ऐश्वर्याचा वाद झाल्याची चर्चा आहे. लोकल मीडियाच्या रिपोर्टनुसार तेजप्रताप यादव आणि पत्नीमध्ये हनीमूनवरुनच वाद सुरु झाला होता. ऐश्वर्याला हनीमूनसाठी इंडोनेशियाला जायचं होतं. पण त्यासाठी तेजप्रताप यादव यांनी नकार दिल्याने हा वाद सुरु झाला. 


एवढंच नाही तर मॉर्डन विचारांच्या ऐश्वर्याला सिगरेट आणि ड्रिंक करण्याचादेखील शौक आहे, असा आरोपही तेजप्रतापने ऐश्वर्यावर केला आहे. आपण आता संसाराची गाडी पुढे नेऊ शकत नाही, असंही तेजप्रताप यादव यांनी म्हटलंय.  


तसंच ऐश्वर्या तिचे पिता चंद्रिका प्रसाद राय यांना सारण लोकसभा मतदार संघातून तिकीट मिळावं यासाठी तेज प्रतापवर दबाव टाकत असल्याचीही चर्चा आहे.