नवी दिल्ली : सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु  उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांवर जोरदार टीका करताना गिरिराज सिंह म्हणाले, अगदी 70 टक्के नोकऱ्या या 10,000 रूपयांपेक्षाही कमी उत्पन्न  देणाऱ्या आहेत. तरीही एमएसएमई क्षेत्रात कमीत कमी 10 कोटी लोकांना प्रतिवर्ष रोजगार मिळतो. देश बदलत आहे. वास्तव परिस्थिती वेगळी आहे. मात्र, तरीही सरकारवर रोजगार निर्मिती केली नसल्याचा आरोप केला जातो. आरोप करणाऱ्या अशा मंडळींनी सरकारवर टीका करण्यापेक्षा आपला चष्मा बदलावा असेही सिंह यांनी म्हटले आहे.


दरम्यान, सरकारच्या कामगिरीवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आले आहे. रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याची टीका विरोधाकांनी नेहमीच केली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष आणि संभाव्य अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सरकार रोजगार निर्मितीत कमी पडल्याची टीका अनेकदा जाहीररित्या केली आहे. केवळ विरोधकच नव्हे तर, अर्थशास्त्रातल्या अभ्यासकांनीही सरकार रोजगारनिर्मितीत अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.