Crime News : मुंबईत (Mumbai News) दररोज गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत असतात. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. उत्तर प्रदेशात (UP Crime) हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्यानंतर तिला मुंबईत आणून विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्यांनी आणि पतीने वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोपही पत्नीने केला आहे. पीडित महिलेने  सासू, सासरे यांच्यासह आठ जणांविरोधात तक्रार केली आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी या प्रकरणाचा तपास दिह पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र प्रताप सिंग यांच्याकडे सोपवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडितेचा विवाह 7 सप्टेंबर 2021 रोजी प्रतापगड येथील लालगंज आजरा येथे राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. विवाहानंतर काही दिवस  घरी सर्व काही सुरळीत चालले होते. मात्र नंतर हुंड्यासाठी महिलेचा छळ होऊ लागला. माहेरच्या लोकांनी हस्तक्षेप केल्यानंतर तिचा छळ थांबला. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये ती मुंबईत सासरच्यांसोबत राहायला आली. त्यावेळी महिलेला कळले की तिच्या पतीचा आधीच विवाह झाला होता आणि हे प्रकरण कोर्टात होतं. याबाबत विचारले असता पती, सासू, भावजय, मेहुणे यांनी पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली.


पतीला मला वेश्याव्यवसायात ढकलायचे होते असाही आरोपी पीडितेने केला आहे. पती रोज रात्री तिला घरातून हाकलून देत होता. त्यावेळी ती कुठेही न जाता घराजवळच रात्र काढायची. एकदा असेच घराबाहेर काढले असता पीडिता सकाळी घरी परतली. मात्र त्यावेळ घरच्यांनी तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर 15 जून रोजी पतीने पीडितेला दुसऱ्या व्यक्तीला विकले. तिच्या सहा महिन्यांच्या मुलालाही निर्दयी पतीने घराबाहेर फेकले.


दरम्यान, त्यानंतर ती कशीतरी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिच्या माहेरच्या घरी आली. त्यानंतर तिने घरच्यांना हा सगळा प्रकार सांगितला. मंगळवारी, पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात नेले. तिथे पीडितेने पोलीस अधीक्षकांना तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल माहिती दिली. पोलिसांनाही हा सर्व प्रकार ऐकून धक्काच बसला. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रमुख तपास करत आहेत. महिलेचे आरोप योग्य असल्यास एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले.


हिंदू असल्याचे सांगून मुस्लीम तरुणाकडून फसवणूक


रायबरेलीत लव्ह जिहादचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. रायबरेलीमध्ये एका तरुणावर नाव बदलून हिंदू तरुणीला प्रेमात अडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमील नावाचा एक तरुण शैलेंद्र असल्याचे भासवून एका हिंदू तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. मात्र तरुणाचे वास्तव समोर येताच तरुणीला धक्का बसला.