Crime News In Marathi: पती हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात नाही, या क्षुल्लक कारणावरुन पत्नीने पतीला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून ही विचलित करणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना रेल्वे रूळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुजफ्फरपूर येथे राहणाऱ्या राजवीरचं लग्न 9 महिन्यांपूर्वी निशा नावाच्या महिलेसोबत झालं होतं. निशा बहादुरपूर येथील रहिवाशी आहे. राजवीरच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पत्नी निशाला घरी जेवण करायचा कंटाळा यायचा त्यामुळं ती सतत हॉटेलमधून जेवण मागवण्याचा हट्ट करायची. यातून त्या दोघा पती-पत्नींमध्ये वाद होत होते. याच वादातून आणि हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा हट्ट आणि सवय यातूनच महिलेने तिच्या पतीची हत्या घडवून आणल्याची चर्चा आहे. 


राजवीरच्या कुटुंबीयांनीही निशावर अनेक आरोप केले आहेत. कुटुंबीयांच्या आरोपांनुसार, लग्नानंतरही पत्नी निशा राजवीरला पसंत करत नव्हती. राजवीरच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की निशाचे एका दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू होते. त्यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यामुळंच त्यांनी राजवीरचा काटा काढला असल्याचा त्यांचा आरोप आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीरचे वडिल उपेंद्र सिंह यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुलाला कट रचून सासरी बोलवले आणि तिथे गेल्यावर पत्नी, सासू, सासरे यांनी संगनमताने त्याची हत्या केली. राजवीरच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी राजवीरच्या पत्नीसह सासू, सासरे यांना अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर या प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, कुटुंबीयांनी हत्येचा आरोप लावला आहे. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यानुसार कारवाई करण्यात येईल. 


पुण्यात चिकन दिले नाही म्हणून...


पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणात पत्नीने चिकन बनवून न दिल्यामुळं पतीने याची शिक्षा चिमुकल्या मुलीला दिली आहे. जेवणात चिकन न दिल्यामुळं चिडलेल्या वडिलांनी लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. वडिलांनी केलेल्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.  या प्रकरणी महिलेचे वडील रघुनाथ लाला पवार पंचवटी, पाषाण) यांन चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.