पुणे : निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची मेगाभरती झाली. पण यातल्या अनेक नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेरिटवर आमदारांची भरती होईल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. भाजपा आणि अपक्ष मिळून १४ ते १५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपर्कात असलेल्या या आमदारांना योग्यवेळी पक्षात घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवाय ही भरती मेगाभरती नसून मेरिटवर भरती असणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले. भाजपात गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक आहेत, पण स्थानिक नेत्यांशी बोलूनच भाजपात गेलेल्या नेत्यांना परत घेण्याबाबत विचार करणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावं घेऊन त्यांना आता अडचणीत आणणार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.


ज्या भाजपाविरोधात लढलो त्या पक्षासोबत जाण्याला मर्यादा आहेत, असं सूचक विधानही जयंत पाटील यांनी केलं. राष्ट्रवादीच्या बैठकीला आले असताना पाटील यांनी भाजपासोबत जाण्याची शक्यता पूर्णतः फेटाळली नाही. शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात 'दगडापेक्षा वीट मऊ' अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्यात सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. शरद पवारच याबाबत निर्णय घेतील, असंही पाटील म्हणालेत.


पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड हे दिग्गज नेते उपस्थित होते.


सोमवारी सोनिया गांधी-शरद पवार यांच्या बैठकीनंतर मंगळवारी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते चर्चा करुन पुढे काय करायचं याची भूमिका ठरवतील, असं या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.