मुंबई : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन योजना सुरु केली. दरम्यान, कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. त्यामुळे शिवभोजन केवळ ५ रुपयांत उपलब्ध करुन दिले. राज्यात २६ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज्यात २६ जानेवारी २०२० रोजी शिवभोजन या महत्त्वाकांक्षी योजनेचा आरंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतला. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पाच रुपयात शिवभोजन देण्याच्या निर्णयास मार्च  २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.



 कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११  ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.  शहरी भागासाठी प्रती थाळी ४५  रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे.


शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७  हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ३१ नागरिकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनुक्रमे २४ लाख ९९ हजार २५७, ३३ लाख ४४  हजार ४०, ३० लाख ९६ हजार २३२ लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून आजपर्यंत तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.