कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर (Ahmadnagar Crime) जिल्ह्यातील राहुरीमध्ये (Rahuri) कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीने रात्री झोपेत असतानाच पत्नी आणि सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडच्या सहाय्याने प्रहार करुन दोघांचा खून केला आहे. पत्नी आणि सासूला संपल्यानंतर आरोपी पतीने घरातून पळ काढला आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Ahmadnagar Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नी नूतन सागर साबळे (वय 23 वर्षे) तर सासू सुरेखा दिलीप दांगट (वय 45 वर्षे) अशी मयतांची नावे आहेत. राहुरी तालुक्यातील कात्रड गावामध्ये मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी सागर सुरेश साबळे याने राहत्या घरात पत्नी आणि सासू या झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार करून दोघांची हत्या केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय.


दरम्यान, दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आरोपीच्या भावाने पाहिल्यानंतर त्याने या घटनेची माहिती राहुरी पोलिसांना दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे , पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.