मुंबई / पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्याच्या मावळ, खेड आणि जुन्नर तालुक्यातील विविध गावांना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यासाठीच पाहणी दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाहागाव  येथील मंजाबाई अनंता नवले (६५) आणि नारायण अनंता नवले (३८) यांच्या वारसांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.
 
मावळ तालुक्यातील भोयरे, पवळेवाडी, खेड तालुक्यातील करंजविहीरे, शिवे गावांना भेट देऊन येथील नुकसानीची पाहणी केली. बाधित शेतकरी, नागरिक, गावकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. कोणत्याही बधितांचे नुकसानीचे  पंचनामे राहता कामा नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या.


खेड तालुक्यातील करंजविहीरे येथील झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते. करंजविहीरे येथील पॉलिहाऊसचीही त्यांनी पाहणी केली.  शिवे येथील स्मशानभूमीतील नुकसानीची तसेच धामणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून पडझड झाली.  यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या सह इतर अधिकारी उपस्थित होते.



जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी, सावरगाव येथील द्राक्ष बागेची, पारुडे,   येणेरे  येथील आंबा,  केळीच्या बागेच्या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली.  जुन्नर तालुक्यातील येणेरे-ढगाडवाडी येथील बाळू बबन भालेकर यांच्या नुकसानग्रस्त घराचीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.