श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : 2008 साली केंद्रात काँग्रेसची (Congress) सत्ता असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी विधवा कलावती बांदूरकर (Kalavati Bandurkar) या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (monsoon session) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेमध्ये कलावती बांदूरकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे त्या नक्की कोण आहेत अशी चर्चा सुरु झाली होती. सभागृहात बोलताना कलावती बांदूरकर यांच्या नावाचा उल्लेख करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केंद्र सरकार विरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावादारम्यान संसदेतील चर्चेत कलावती बांदूरकर यांच्या नावाचा उल्लेख केला. कलावती यांच्या घरी राहुल गांधींनी केवळ भेट देऊन तिला सत्ता असतानाही 6 वर्ष बेदखल ठेवले. पण कलावती यांना घर, शौचालय, वीज, धान्य, आरोग्य सुविधा या नरेंद्र मोदी यांनी दिल्या असा दावा शाह यांनी संसदेत केला. मात्र या दाव्याची पोलखोल कलावती बांदूरकर यांनी केली आहे. मोदी शाह खोटे बोलत आहे. राहुल गांधी यांनी माझ्या घरी भेट दिली, त्यानंतर संसदेत माझी कहाणी सांगितली त्यामुळेच मला मदतीचा ओघ सुरू झाला. मला घर, वीज, शौचालय ह्या साऱ्या गोष्टी मिळाल्या. याशिवाय मुलींचे लग्न, मुलाचे शिक्षण करू शकले ते केवळ राहुल गांधी व काँग्रेसमुळेच असे स्पष्ट करत कलावती बांदूरकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे विधान खोटे असल्याचे सांगितले आहे. कलावती बांदूरकर या यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका या गावात राहत आहेत.


काय म्हणाले होते अमित शाह?


"या संसदेमध्ये असा एक सदस्य आहे ज्यांना 13 वेळा राजकारणामध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ते 13 वेळा अयशस्वी ठरलेत. कलावती नावाच्या एका गरीब महिलेला भेटण्यासाठी ते तिच्या घरी गेले होते तेव्हाची लॉन्चिंग मी पाहिली होती. मात्र त्यांनी किंवा काँग्रेसने त्या गरीब महिलेला काय दिलं? घर, राशन, वीज, गॅस, शौचालय हे सारं त्या महिलेला मोदी सरकारकडून मिळालं," असं अमित शाह म्हणाले होते.


हे ही वाचा : यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण?


काय म्हणाल्या कलावती बांदूरकर?


"राहुल गांधी आल्यानंतरच मला मदत मिळाली. राहुल गांधी आल्यानंतर वीजदेखील आली. पंतप्रधान मोदी निवडूण आल्यानंतर मला आर्थिक मदत मिळाली नाही. मला गॅस देखील मिळाला नाही. अमित शाह जे काही बोलले ते सर्व काही खोटं आहे. सर्व काही मला राहुल गांधी यांनी दिलं. आपल्याला मदत राहुल गांधींनी केली. त्यामुळे मोदींनी मदत केली असं म्हणणार आहोत का? मोदींनी काहीच मदत केली नाही. मग केली म्हणण्याला अर्थ काय? कोणती मदत केली? 2008 साली घरकुल मंजूर झाले होते," अशी माहिती कलावती बांदूरकर यांनी दिली.