राळेगणसिद्धी : समाजसेवक अण्णा हजारे आज सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. लोकपाल नियुक्ती करण्यासाठी अण्णा यावेळेसे जंतर मंतर किंवा रामलीला येथे नाही तर राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत. माझे आंदोलन कोणती व्यक्ती अथवा पार्टीच्या विरुद्ध नाही तर समाज आणि देशाच्या हितासाठी असल्याचे अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितले. समाज आणि देशाच्या हितासाठी मी अनेक आंदोलन केली आहेत. तशाच प्रकारचे हे आंदोलन आहे. लोकपाल कायदा बनवून 5 वर्षे झाली पण कारणे देणेच सुरू आहे. सरकारच्या मनात खरच काही असत तर इतका वेळ लागला असता का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 2011-12 मध्ये अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर आमरण उपोषणाला बसून सरकारला हादरवलं होतं. या आंदोलनात कोणताही राजकिय पक्ष जोडला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ लोकायुक्ताच्या अधिकार क्षेत्रात आणण्याचा निर्णय नुकताच झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (29 जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त मंत्री, विरोधी नेते देखील लोकायुक्तच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीनंतर सांगितले. भ्रष्टाचारमुक्त शासन करण्यासाठी हे चांगले पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप लागल्यानंतर लोकायुक्त त्याप्रकरणाची चौकशी करु शकतात किंवा करुन घेऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले. 



अण्णा हजारे यांनी लोकपालच्या अंमलबजावणीवरून फडणवीस सरकारवर यापूर्वीही ताशेरे ओढले होते. लोकपाल कायदा झाल्यानंतर १ वर्षांच्या आत राज्यात लोकायुक्त कायदा होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही कार्यवाही केली नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री मिळाले, असे कौतुक आपण करीत होतो. पण साडेचार वर्षानंतर मुख्यमंत्र्यांची अवस्था 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला', अशी झाल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली होती. 


तसेच अण्णा हजारे यांनी केंद्रातील मोदी सरकारलाही धारेवर धरले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारने लोकपाल कायदा लागू केला नाही. आज हा कायदा अस्तित्त्वात असता तर राफेल घोटाळा झाला नसता. लोकपाल कायद्याच्या अंमलबाजवणीत चालढकल करून सरकारने जनतेची दिशाभूल केली, असे अण्णा हजारेंनी म्हटले होते.