मुंबई : राज्यसरकारने १० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. आतंकवादी हल्ला होण्याची भीती आहे म्हणून हे जमावबंदी आदेश देण्यात आले आहेत. सरकारकडे काही माहिती असेल म्हणून हे आदेश देण्यात आले असतील. मात्र, याच काळात गुढीपाडवा आणि रामनवमी असून यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढीपाडवा आणि रामनवमी हे दोन्ही सण हिंदूंसाठी महत्वाचे आहेत. मात्र, हिंदूंच्या सणांबाबत राज्य सरकारची भूमिका सुस्पष्ट नाही. हिंदू सणांना परवानगी देताना यांच्या हाताला लकवा का मारतो हे कळत नाही, अशी टीका शेलार यांनी केलीय. 


रामभक्तांचा कार्यक्रम म्हटला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का येते, असा सवाल करतानाच या दोन्ही सणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परवानगी देण्यात यावी. यात खोड टाकू नये अशी मागणी त्यांनी केली.


6 एप्रिल हा भाजपचा वर्धापनदिवस आहे. या दिवशी 'एक देश' व्यापक कार्यक्रम ठरवला आहे. या दिवशी प्रत्येक पोलिंग स्टेशनवर (शक्ती केंद्रावर) सार्वजनिक कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर संबोधित करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.


यशवंत जाधव यांनी 'आई' या नात्याला काळिमा लावण्याचं पाप केलंय. कडवट हिंदूंनी तर ते कधीच करू नये. महाराष्ट्राच्या राजीय इतिहासात आईच्या नावाने खोटी शपथ घेतोय हे पहिल्यांदा बघतोय, अशी टीका शेलार यांनी यशवंत जाधव यांच्यावर केलीय.