श्रीवर्धन : शरद पवार यांना न बोलावता जायची सवयच आहे. सरकार स्थापनेवेळीही ते न बोलावता जात होते आणि ईडीनेही न बोलावताच ते गेले, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. श्रीवर्धनमधल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. पवारांच्या पापाचा घडा आता भरतो आहे. पवार साहेब आम्ही तुम्हाला स्वस्थ बसून देणार नाही, कारण या पुढे आमचंच सरकार येत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० रुपयांमध्ये जेवणाची थाळी देणार म्हणजे देणारच. मी दिलेलं अन्न तुम्ही खाणार का? अजित पवारांनी दिलेलं पाणी तुम्ही पिणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सभेसाठी आलेल्या शिवसैनिकांना विचारला. तटकरेंना त्यांच्या कुटुंबासह घरी बसवणार, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.


याआधी माणमध्ये झालेल्या सभेतही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसतात तर पावसात भिजायची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेची चर्चा महाराष्ट्रात होत आहे. या सभेवरूनच उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका केली.