औरंगाबाद : औरंगाबादच्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये कचरा लपवल्याप्रकरणी महापौर नंदू घोडेले यांनी शहरवासियांची माफी मागितलीय. ऐतिहासिक वास्तूचा जराही विचार न करता अशाप्रकारे कचरा लपवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दोन दिवसांत कारवाईचं आश्वासन महापौरांनी दिलंय. 'झी मीडिया'नं बातमी दाखवताच महापौरांनी त्याची तात्काळ दखल घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, औरंगाबादमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचराप्रश्न लवकर सुटेल अशी आशा व्यक्त केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारही मदत करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. 


कचऱ्याचा प्रश्न काही सुटेना 


तब्बल ६५ दिवस उलटून गेले तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न सुटला नाही. त्यात आता कचरा प्रश्न सोडवण्याच्या नादात महापालिका थेट ऐतिहासिक वास्तूंमध्ये कचरा लपवण्याचे उद्योग करत असल्याची धक्कादायक बाब पुढं आल्यानंतर नागरिकांना एकच धक्का बसलाय. 


कचऱ्याचे ढीगच्या ढीग


औरंगाबाद शहरातील हा ऐतिहासिक टाऊल हॉल... ४०० वर्षांचा याला इतिहास आहे. म्हणूनच या इतिहासाचा गौरव करण्यासाठी महापालिकेनं इथ कला दालन सुद्दा सुरु केलंय. मात्र जिथं कला जपायची तिथं सध्या महापालिकेनं कचरा जपला... टाऊनहॉलच्या इमारतीत एक टेबन टेनिस कोर्ट सुद्धा उभारण्यात आलं त्या ठिकाणचा उपयोग महापालिकेनं कचरा लपवण्यासाठी केला. 


फक्त टाऊन हॉलच नाही तर पैठण गेटमध्ये सुद्दा कचरा लपवण्यात आल्याचं समोर आलं. हा सगळा प्रकार महापौरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी औरंगाबादकरांची माफी मागत तात्काळ टाऊल हॉलचा कचरा हटवण्याचे आदेश दिले आहेत. 


माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाहीये, ऐतिहासिक वास्तूत कचरा लपवणे म्हणजे या वास्तूंचा तो अपमान आहे, तसाही कचरा प्रश्नाने शहराचा कचरा झालाच आहे त्यात आता ऐतिहासिक वास्तूंची विटंबना करून ऐतिहासिक शहराचे नाव आणखीनंच खराब झालय, कारवाई होईलही मात्र खरंच असा कचरा लपवून कचरा प्रश्न सुटेल का? हाच खरा प्रश्न आहे.