अमर काणे, झी मीडिया :  बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर (Badlapur Case) झालेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण राज्याच उमटले आहेत. या घटनेविरोधात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. विरोधकांनीही सरकारवर सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. आता बदलापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. या समितीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार बदलापूरमधील त्या अल्पवयीन मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार होत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय वडेट्टीवारांनी उघड केला अहवाल
बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार (Sexually Assaulted) झाले. अक्षय शिंदे या नराधमानं चिमुरड्यांसोबत पाशवी कृत्य केलं. आरोपी अक्षय शिंदेने एकवेळा नाही तर अनेकवेळा चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता आहे.. बदलापूर प्रकरणी दोन सदस्यीय समितीने नोंदवलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय.  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) उघड केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आलाय..


समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती
पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला गंभीर इजा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय, तसंच  शाळा प्रशासनाने तब्बल 48  तास तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नसल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 
अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आरोपी अक्षय शिंदेची कोणतीही सामाजिक पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली. अक्षय शिंदेची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली की कोणाच्या शिफारसीद्वारे? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. त्याला शाळेच्या आवारात सर्वत्र ओळखपत्राशिवाय सहज प्रवेश मिळत होता. स्वच्छतागृह एका निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कक्षापासून दूर अशी या शाळेची रचना आहे. सुरक्षिततेसाठी स्वच्छतागृहाजवळ सीसीटीव्ही बसवलेले नाहीत अशा धक्कादायक बाबी या अहवालातून समोर आल्या आहेत.. 


धक्कादायक म्हणजे तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही. पीडित चिमुकलीवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास लागले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांवरही या अहवालात गंभीर ठपका ठेवण्यात आलाय.. पोलिसांनी तक्रारीसाठी आलेल्या पालकांना 12-12 तास बसवून तर ठेवलं.  शिवाय पालकांना चुकीचे प्रश्न विचारत आपलं अज्ञानही उघड केल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय.


'मुली दोन तास सायकल चालवतात का?' अशी तपास अधिकाऱ्याने पालकांना विचारणा केली, यावरून अधिकाऱ्याला संवेदनशीलता नसल्याचंही उघड केलं आहे. बदलापूरच्या प्रकरणात नराधम अक्षय शिंदेंने पाशवी कृत्य तर केलंच.  पण शाळा प्रशासन आणि पोलिसांनी कमालीचा निष्काळजीपणा दाखवला. आता या नराधमाला तर शिक्षा झालीच पाहिजे.. मात्र निष्काळजीपणा करणाऱ्यांनाही धडा शिकवा अशी मागणी केली जात आहे.