Badlapur Minor School Girls Sexual Harassment Case : मुंबईचे उपनगर बदलापुरातील नावाजलेल्या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचार झाला. त्यानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट पसरलीय. शाळेतील स्वच्छता कामगार आणि शाळेतील मुलांचा काठीवाला दादा अशी ओळख असलेल्या नराधम अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी मागणी जोर धरतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच शाळेमध्ये नेमकं चिमुकलीसोबत काय घडलं आणि पालकांना या घटनेची माहिती कशी मिळाली. याबद्दल एका खासगी वृत्तवाहिनीला पालकांनी मुलाखत दिलीय. या मुलाखतीत आई वडिलांनी वेदनादायी घटनेबद्दल सांगितल्यावर आपलं मन सुन्न होईल. 


चिमुकलीसोबत शाळेत काय घडलं?


चिमुकलीची आई म्हणाले की, 16 ऑगस्टचा दिवस होता, मी घरी पोहोचल्यावर माझ्या वडिलांनी सांगितलं की तुझ्या मुलीसोबतच्या मैत्रिणीने वडिलांना सांगितलं की, तिच्यासोबत शाळेत विचित्र गोष्ट घडली आहे. ते म्हणाले की, तुमच्या मुलीने असं काही सांगितलं आहे का? हे ऐकून मी सुन्न झाली होती. त्यादिवशी माझ्या मुलीला ताप होता. म्हणून ती शाळेत गेली नव्हती. 


मग माझ्या लक्षात आलं की एक आठवड्यापूर्वीही तिला ताप आला होता. ताप काही कारण नसताना अचानक वारंवार येणार नाही. त्यात ती शाळेत जाणार नाही असंही मला म्हणाली होती. मग मला सगळं मागचं आठवलं.
13 ऑगस्टचा दिवस होता, माझी मुलगी त्या दिवशी शाळेत गेली होती. त्यादिवशी पहिली मुलगी शाळेत गेली नव्हती. त्यानंतर मला कामावर असताना शाळेतून फोन आला. त्यांनी मला सांगितलं, तुमची मुलगी खूप रडतेय. ती रडायचं बिलकुल काही केल्या थांबत नाही आहे. तिला तुम्ही घरी घेऊन जा. 


त्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हणजे तिच्या आजोबांना फोन केला अन् सांगितलं की लेकीला शाळेतून घेऊन या. त्यानंतर माझे वडील तिला शाळेत घ्यायला गेले. नेहमी हसत खेळत एकटी येणारी त्यांची नात टीचरला पकडून रडतच बाहेर आली. 


तिने आजोबांचा हात धरला आणि ती वाकडी तिकडी चालत घराच्या दिशेने निघाली. त्या रात्री तिला पुन्हा ताप आला. आता मी घाबरली होती. सकाळी उठल्यावर 14 तारखेला तिला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिला ताप आहे म्हणून दाखवलं. 


त्याच दिवशी माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी माझ्या पतीला सांगितलं शाळेत त्यांच्या मुलीसोबत काय घडलं ते. माझे पतीने सांगितलं की, ती काही बोलत नसून तिला ताप आलाय. मग माझ्या पतीला संशय आला. कारण आमच्या मुलीलाही ताप होता, शाळेत जायला ती घाबरायची अन् झोपेत हातवारे करुन घाबरुन उठायची. 


आम्ही तिला 15 ऑगस्टला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे महिला डॉक्टरला आम्ही शंका बोलून दाखवली. त्यांनी मुलीची संपूर्ण तपासणी केली. तेव्हा डॉक्टरने सांगितलं की, गुप्तांगात 1 सेंटीमीटरपर्यंत इजा झाली आहे. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. कोणीतरी काहीतरी केल्याशिवाय हे होणार नाही. म्हणून तिला वारंवार ताप येत आहे. डॉक्टरांनी आम्हाला पोलिसांकडे जायला सांगितलं. 


चिमुरडी आईला म्हणाली की, 'दादा वॉशरुमला नेतो अन् मग...' 


तेव्हा आम्ही मुलीला विचारलं. तुला कुठे दुखतंय का? काही झालंय का तुला? तुला कोणी हात लावला का? त्या चिमुकलीने जे सांगितलं त्यानंतर....ती म्हणाली की, 'शाळेत एक दादा आहे. तो मला वॉशरुममध्ये घेऊन जातो मला हात लावतो. मला गुदूगुदू करतो आणि मारतो पण...'


त्यादिवशी घरात संताप अन् भयान शांतता होती, दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला आम्ही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन दुपारी साडेबारा पोलीस स्टेशन गाठलं. तेव्हा तिथे शितोळे मॅडम होत्या, त्यांना सांगितलं की आम्हाला शाळेविरोधात तक्रार करायची आहे आणि शाळेतील प्रकाराबद्दल सांगितलं. 


पोलीस स्टेशनमध्ये काय झालं?


त्यावेळी शितोळे यांनी मुलीला प्रश्न विचारले, तुझे नाव काय कुठे राहते वगैरे. पण पोलिसाचा ड्रेस पाहून आम्ही मुलगी खूप घाबरली होती. ती काही बोलली नाही. मग शितोळे मॅडमला लक्षात आलं ती पोशाखाला घाबरत आहे. मग त्या साध्या कपड्यावर आल्या आणि त्यांनी मुलीशी बोलायचं प्रयत्न केला. तेव्हा तिने सांगितलं 'शाळेतला काठीवाला दादा वॉशरूमला गेल्यावर गुदूगुदू करतो, मारतो आणि फ्रॉक वर करतो.'


एवढं सगळं सांगितल्यावरही त्यांनी तक्रार लिहून घेतली नाही. ज्या डॉक्टरडे आम्ही तिला घेऊन गेले होतो त्यांचा रिपोर्टही दाखवला. तर त्या आम्हाला बाजूला घेऊन गेल्या आणि म्हणाल्यात चिमुकलीने सायकल चावली असले म्हणून तिच्यासोबत असं झालं असेल. 


आम्ही त्यांना सांगितल, ती लहान आहे तिला सायकल अजून चालवताही येत नाही आणि तिचाकडे सायकलही नाही. आम्ही दुपारी 12.30 वाजता पोलीस स्टेशनला गेलो होता आता रात्रीचे 9 वाजले होते. अखेर रात्री 9.30 वाजता त्यांनी तक्रार नोंदवून घेतली. 


त्यानंतर रात्री साडेबारा एक वाजता चिमुकलीला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन जाण्यात आलं. तिथे गेल्यावर दिसलं की, तिथे मेडकलची कुठलही सुविधाही नव्हती. मग आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला आलो. त्यानंतर शितोळे मॅडमने सांगितलं आता उल्हासनगरला जायचं आहे. त्यानंतर आम्ही उल्हासनगरला गेलो आणि तिथे पुन्हा सगळी माहिती घेण्यात आली, पेपरवर्क करण्यात आलं आणि जबाब नोंदवून घेतला. पण आता मुलगी काहीही बोलत नव्हती. हे सगळं करता करता पहाटेचे 4 वाजले होते. 


शाळा मुख्याध्यापक काय म्हणाले?


मग आम्ही शाळेत गेलो तेव्हा मुख्याध्यापक यांना घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले की आमच्या शाळेत असं घडूच शकत नाही. आमच्याकडे कुणी पुरूष नाही. एवढंच नाही तर 10-15 मिनिटांनी त्यांनी विषय बदलला. सीसीटीव्ही बंद आहेत, कॅमेरा चालू आहेत पण रेकॉर्डिंग होत नाही. असे उडवाउडवीचे उत्तर देत होते. 


या घटनेनंतर आम्ही आणि आमचं कुटुंब खूप मानसिक तणावातून जात आहोत. तिला आम्ही घराबाहेर काढून कोणाला दाखवू शकत नाही. तिला नॉर्मल करण्याच पूर्ण प्रयत्न सुरु आहे. ती खूप मुश्किलने झोपते आणि झोपली की अचानक उठते, रडते. मी शाळेत जाणार नाही असं म्हणते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शाळेची आठवण काढते. 


प्रत्येक आई वडिलांप्रमाणे तेही म्हणालेत की, आमची मुलगी व्यवस्थित राहावी, तिला पुढे आयुष्य आहे, तिचं कुठे नाव येऊ नये. शिवाय त्या शाळेतील प्रत्येक मुलींचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीय.