नागपूर: सध्या चर्चित असलेला 'संजू' सिनेमा पाहिल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 'पेनची ताकद एखाद्या अणूबॉम्बपेक्षाही जास्त विध्वंसक ठरु शकते. माध्यमं, पोलीस आणि न्यायालयं यांचे मतंही एखाद्याच्या जीवनावर परिणाम करु शकतात', असे गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या एका चर्चेतील संदर्भ देत, 'एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्याला संजय दत्त पूर्णपणे निरपराध असल्याचे सांगितले होते', आठवण त्यांनी यावेळी सांगितली.'


संजू सिनेमा खरोखरच सुंदर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर येथे 'समाजातील कला आणि कलाकारांचे योगदान' या विषयावर एका सांस्कृतिक कार्यक्रमात गडकरी बोलत होते. या वेळी, गडकरी यांनी संजू सिनेमाचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले, मी संजू सिनेमा पाहिला. सिनेमा खरोखरच सुंदर आहे. माध्यमे, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांची मते एखाद्यावर कशा प्रकारे परिणाम करु शकतात हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. सिनेमात दाखवलेली  सुनिल दत्त आणि त्यांचा मुलगा संजय यांची परिस्थिती पाहून मी डिस्टर्ब झालो. हे सांगतानाच गडकरी यांनी एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्याला संजय दत्त पूर्णपणे निरपराध असल्याचे सांगितले होते, अशी आठवण सांगितली.


छोटी गोष्टही जीवन उद्ध्वस्त करू शकते


या वेळी बोलताना गडकरी यांनी प्रसारमाध्यमांबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, एकादी व्यक्ती, संस्था, बँक आदींबाबत लिहिताना प्रसारमाध्यमांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हे मी नेहमी सांगतो. कारण, कोणत्याही व्यक्तिने अतिशय कष्टाने त्याच्या जीवनाला आकार दिलेला असतो. पण, एक छोटी गोष्टही त्याचे जीवन उदद्धवस्त करण्यास कारण ठरू शकते, असेही गडकरी या वेळी म्हणाले.