लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. पण काही समर्थक याच नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत आहेत. पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावरुन (Social Media) समर्थकांना आत्महत्या करु नका असं आवाहन केलं असतानाही हे सत्र सुरु आहे. यामुळे पंकजा मुंडे भावूक झाल्या असून आपल्याला अपराधी वाटत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी सोमवारी अंबाजोगाई तालुक्यातील डीघोळ आंबा येथील पांडुरंग सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर संवाद साधताना त्यांनी मनातील सल बोलून दाखवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड लोकसभा निवडणुकीत (Beed Lok Sabha Result) पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांचं कट्टर समर्थक असलेल्या पांडुरंग सोनवणे यांना धक्का बसला होता. याच नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पंकजा मुंडे यांनी आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केलं. तसंच आपल्याला अपराधी वाटत असून, माझ्याविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे असं म्हटलं आहे 



"लोकसभा निवडणुकीतील माझ्या पराभवानंतर निराश झालेले लोक स्वत:चे प्राण देत आहेत. मला असं वाटतं की माझ्यावर 307 दाखल करायला पाहिजे. कारण मीच कारणीभूत आहे की एवढं लोकांवर प्रेम केलं. माझ्यामुळे लोकांचे जीव गेले. नका रे असं करु. लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने मला सध्या अपराधी वाटत आहे. एरवी मी हिंमतीने लढणारी आहे. मात्र, या सगळ्या गोष्टींमुळे मी सध्या प्रचंड डगमगली आहे," अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. पांडुरंग सोनवणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 



"मी हिंमतीने लढणारी आहे, पण सध्या या गोष्टींनी प्रचंड डगमगली आहे. या कुटुंबाच्या मागे मी उभी राहणार आहे. पण आत्महत्येसारख्या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही. मी लोकांना आवाहन करते की, त्यांनी असं काही करु नये. आपल्या लहान लेकरांना, परिवाराला वाऱ्यावर सोडून असे आत्महत्या करणं हे मला आवडणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर मी नक्की तुम्हाला त्याची संधी देईल. पण आपला जीव गमावू नका. तुमचा जीव म्हणजे माझा जीव आहे असं समजून जपा. या निराशेतून बाहेर या, जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असला पाहिजे. तुमचा आक्रोश आणि प्रेम तुमच्या वर्तवणुकीतून, कामातून आणि कष्टातून व्यक्त करा," असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. 



राजकारणात जय-पराजय हे सुरु असते. पण सध्या राजकारण ज्या पद्धतीने आकार घेत आहे, त्यामुळे लोक निराशेच्या गर्तेत कोसळत आहेत. आम्ही कमी आहोत, आम्ही राजकारणाच्या प्रवाहात काहीच बदलू शकत नाही, असा न्यूनगंड लोकांमध्ये तयार होत आहे. ज्या पद्धतीने राजकारण बदलत आहे, या भावना लोकांना आक्रोशाकडे नेत आहेत, असंही त्या म्हणाल्या.