मुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस यांना जोरदार धक्का बसला आहे. नागपूरमध्ये काँग्रेस आघाडीने मुसंडी मारली आहे. तर धुळ्यात भाजपने मुसंडी मारलीय. जिल्हा परिषद निकालांमध्ये धुळ्यात काय होणार याची सर्वांनाच उत्सुक्ता होती. कारण सर्वच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी धुळ्यात तळ ठोकला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीला हादरा बसला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि फडणविसांनी धुळ्यातल्या प्रचारात विशेष लक्ष घातले होतं. त्याचाच परिणाम म्हणजे धुळ्यात भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. आमदार जयकुमार रावल यांच्या मतदार संघात १० पैकी ८ ठिकाणी भाजपनं विजयी आघाडी घेतलीय. तर नंदुरबारमध्ये काँग्रेसनं मुसंडी मारलीय. काँग्रेसच्या सीमा पद्माकर वळवी विजयी झाल्यात. 


काही गटांमधली निवडणूक काँग्रेस नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. नंदुरबार जिल्ह्यात अनेक जागांवर काँग्रेसचीच विजयी  घोडदौड सुरूय. तर नागपुरात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळ लोटताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलीय. भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात महाविकासआघाडी आघाडीवर आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे.