Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेचं भरदिवसा तिच्या कार्यालयातून अपहरण करण्यात आलं. ऑफिसमधून गाडीपर्यंत तिला फरफटत नेण्यात आलं. इतकंच नाही तर यानंतर दोन दिवस तिला वारंवार भुलीचं इंजेक्शन देत, गाडीतचं डांबून ठेवण्यात आलं. अखेर एका तरुणाची मदत घेत तिने पोलिसांशी संपर्क साधला. धक्कादायक बाब म्हणजे, महिलेच्या पतीनेच हा प्रताप केला होता. सुमित शहाणे असं आरोपी पतीचं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या मंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट 2023 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. मात्र आठवडाभरात पतीने वेगवेगळ्या मागण्या सुरु केल्या. या मागण्या न पटल्याने तिने सुमितपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तिने थेट मुंबई गाठली, यानतर काही महिने मैत्रिणीकडे राहिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये आली होती. एका बांधकाम व्यवसायिकाकडे ती काम करत होती. याचा सुगावा सुमितला लागला अन त्यानं पत्नीच्या ऑफिसचा पत्ता काढला. 



19 जूनला सुमित आई आणि चालकासोबत वाकडमध्ये पोहोचला होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास त्याने पत्नीला फरफटत आणून गाडीत बसवलं. त्यावेळी पत्नीचा मित्रही जबरदस्तीने गाडीत बसला. गाडी मंचरच्या दिशेने निघाली होती.  थोडं पुढं गेल्यावर सुमितने पत्नीच्या मित्राला कानशिलात लगावली आणि गाडीतून बाहेर ढकलून दिलं. प्रवासादरम्यान सुमितने पत्नीला भुलीचं इंजेक्शन दिलं. यानंतर गाडीतच डांबून ठेवलं. शुद्धीवर आल्यावर वारंवार भुलीच इंजेक्शन दिलं जात होतं असा आरोप पत्नीने केला आहे.


20 जूनच्या दुपारी पत्नीने सुमितला विश्वासात घेतलं. सांगशील त्या कागदपत्रांवर सही करते, असं तिने सांगितलं. यानंतर सुमितने गाडी मंचर परिसरात आणली. मात्र माझी भूल अद्याप उतरली नाही. असा बहाणा पत्नीने केला. यानंतर ते एका मंदिरात थांबले. पत्नीने संधी साधत एका तरुणाला खुणवत मदतीची मागणी केली. तरुणाला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने मंचर पोलिसांना कळवलं. 


पोलीस मंदिरात पोहचले अन पत्नीची सुमितच्या तावडीतून सुटका झाली. महिलेने पोलिसांवर सगळा घटनाक्रम सांगितला. तिने पती, आई आणि चालकावर अनेक आरोप केले आहेत. आज सकाळी पत्नीने वाकड पोलीस स्टेशन गाठलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपहरण ते सुटका या दरम्यान बेशुद्ध असताना नेमकं काय-काय घडलं, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.