मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाशिवआघाडीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. आज विधिमंडळात महाविकास आघाडीच्या बाजुने १६९-० असा ठराव बहुमताने पास झाला. याआधीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या शपथविधीवर आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठाकरी बाणा पहिल्या दिवशी पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महारांजी शपथ मी पुन्हा घेईन, मी पुन्हा घेईन असे विधान त्यांनी केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्र्यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधींची नावं घेतली. शपथ घेतानाचा फॉर्मेट ठरलेला असतानाही अशा पद्धतीने शपथ घेण्यात आली. जगभरामध्येही शपथविधीचे नियम ठरलेले आहेत. चुकीच्या पद्धतीने शपथ घेतल्यामुळे बराक ओबामांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा शपथ घ्यावी लागली, अशी आठवण फडणवीस यांनी करून दिली. याला मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी शैलीत उत्तर दिले.



जो आपल्या दैवताला मानत नाही. जो आपल्या आईवडीलांना मानत नाही त्याला पुत्र म्हणून जगण्याचा अधिकार नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्यांची आपण शपथ घेतली त्यांचा अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचाय मुख्यमंत्री म्हणाले.



काय म्हणाले फडणवीस ?


कोणत्याही नवीन अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमने होते. मग या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमने का झाली नाही असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. तसंच रात्री १ वाजता अधिवेशनाचं निमंत्रण मिळतं याबाबतही आक्षेप नोंदवला. अधिवेशन हे नियमाला धरून नसल्याचं सांगत अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांनी समन्स बोलवणं गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्र्यांचे उत्तर 


सभागृहात येताना छत्रपती शिवरायांना वंदन करुन मी आत आलो. देशात अनेक राज्य आहेत. पण आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. आपण सर्व त्यांचे भक्त आहोत. आज मी रिकामी बाकांशी लढणार नाही. मोकळ्या मैदानात तलवारबाजी करणारा मी नाही. मी समोरासमोर लढणारा आहे. शत्रूला अंगावर घेणारा आहे. सभागृहात आज मी तसबीरी पाहील्या. हो..मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. माझ्या आईवडीलांची शपथ घेतली. तर यात आक्षेप घेण्यासारख काय आहे ? यांची शपथ घेणे हा गुन्हा असेल तर एकदा नाही मी दहा वेळा घेईन. प्रत्येक जन्मात घेईन असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.