Udhhav Thackrey : काँग्रेसचे बंडखोर हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठ टेन्शन ठरताना दिसत आहे. महाविकास आघाडीतले मतभेद काही कमी होताना दिसत नाहीएत. त्यात ठाकरे गट आणि काँग्रेसचं सूत काही जुळत नाही. सांगली आणि मुंबईत तेच चित्र दिसत आहे. यामुळे ठाकरेंनी थेट कारवाईची मागणी केल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आणि ठाकरेंचं काही जमता जमत नाहीए.  सांगली आणि मुंबईत तेच चित्र दिसतं आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी सांगलीच्या जागेच्या वादेवर पडदा टाकला. मात्र, सांगलीतली बंडखोरी काही थांबली नाही. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला. शक्तीप्रदर्शन करत थेट उमेदवारी अर्जच दाखल केला..


काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगली हा स्वातंत्र्यांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. त्यामुळेच ठाकरे गटाचे आणि मविआचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांची मात्र डोकेदुखी वाढलीय.. आता ठाकरेंनी थेट बंडखोरांवर कारवाईची मागणी केलीय.


एकीकडे सांगलीतला तिढा कायम असताना दुसरीकडे मुंबईतही ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जुळत नाही.  मुंबईत काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज आहेत. याचा फटका ठाकरेंच्या मुंबईतल्या उमेदवारांनाही बसतोय.. दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशी ओळख असलेले अनिल देसाई. मात्र त्यांच्या प्रचाराला काँग्रेसने पाठ फिरवली. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी वर्षा गायकवाड आग्रही होत्या. 


वर्षा गायकवाडांची  नाराजी दूर झाल्याचीही चर्चा होती.. मात्र अनिल देसाईंच्या प्रचाराला काँग्रेस पदाधिकारी आले नाहीत.. तेव्हा मविआत असूनही काँग्रेसच्या कार्यपद्धतीचा ठाकरेंना फटका बसतोय.. आता काँग्रेससोबतचे हे मतभेद ठाकरे कसे दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.. 


उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसला टोला


एकीकडे विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावला. प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं. तसंच आघाडीत जागावाटप होत असताना कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूतही पक्षानं काढायची असते, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. तर एखाद्या कार्यकर्त्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष समर्थ असतात, असंही ते म्हणाले. मात्र कार्यकर्त्यांची समजूत काढू... असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केलाय.