मुंबई : कोरोनामुळे सगळे हादरले असतानाच मुंबईतील स्थिती काहीशी नियंत्रणात राखायला महापालिका आणि राज्य सरकारला यश आलंय. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनाचे २०७ रुग्ण असून त्यातील ८ जणांचा मृत्यू झालाय. यात मुंबईतील ८५ रुग्ण आणि ६ मृतांचा समावेश आहे. मुंबईतील लोकसंख्या पाहता आणि इथे परदेशातून आलेल्या लोकांची संख्या पाहता मुंबईतील स्थिती सध्या तरी नियंत्रणाखाली दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ मार्चपासून परदेशातून लाखो प्रवासी मुंबईत दाखल झाले. त्यातील सुमारे पावणे तीन लाख जणांची विमानतळावर तपासणी करण्यात आली. तर ३ हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. जे पॉझिटिव्ह आढळले त्यांना समाजात फिरण्याआधीच विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले, याशिवाय घरोघरी जाऊनही काही ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यामुळे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात आला. 



तरीही पुढील १० ते १२ दिवस परीक्षेचे आहेत. कारण घरी विलगीकरणात असलेल्यांमध्ये कोरोनाची लक्षणे असतील आणि ते कोणाच्या संपर्कात आले असतील तर त्यांना बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सरकारकडून वारंवार घराबाहेर न पडण्याची विनंती केली जात आहे. मुंबईत कडेकोट बंदोबस्त असूनही लोकं घराबाहेर पडत असल्याच चित्र समोर येत आहे. यामुळे मुंबईतील मुंब्रा परिसरात एसआपीएफच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.