मुंबई / रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागमध्ये धडकणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं असले तरीही या वादळाचा धोका हा रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई या भागातही आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे. जिथे जास्त धोका आहे या ठिकाणच्या प्रशासनाने किनारपट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण केले आहे. दरम्यान, रत्नागिरीत जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपेक्षा वाऱ्याचा जोर वेग वाढला आहे. तसेच पावसानेही हजेरी लावली आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


निसर्ग वादळ जरी रायगड, अलिबागमध्ये धडकणार असले तरी त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्याला सर्वाधिक बसणार आहे.  या दोन्ही तालुक्यातील समुद्र किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग सर्वाधिक असून मुसळधार पाऊस देखील कोसळत आहे. पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी अलिबागच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज आहे. यात समुद्र किनारी असणाऱ्या घरांना मोठा फटका बसू शकतो त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आले आहे.


मुंबईसह कोकण किनारपट्टीला आज निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. काही तासांत हे वादळ धडकत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी वादळासाठी प्रशासन सज्ज असून जवळपास एनडीआरएफच्या २० टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून किनारपट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आले असून चक्रीवादळाचा परिणाम हवामानात झाला असून राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.